
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून आंतरजातीय प्रेमीयुगुलाने नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात नंदिग्राम एक्सप्रेसखाली शुक्रवारी दुपारी भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली आत्महत्या केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शिवराम मनोज क्यातमवार ( वय 22 राहणार भोकर ) आणि धारा माधव मोरे ( वय 20 राहणार रिठा तालुका भोकर ) अशी प्रेमीयुगुलाची नावे आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणाला घरातून विरोध होत होता. शिवराम हा बीकॉममध्ये शेवटच्या वर्गात शिकत असून वडिलांचे बांगड्याचे दुकान सांभाळत असताना आयटीआय शिकत असलेल्या मुलीसोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते.
आंतरजातीय प्रेमविवाह आपला होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि 11 नोव्हेंबर रोजी भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ रेल्वेची वाट पाहत ते बसलेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास नंदिग्राम एक्सप्रेस आली त्यावेळी त्यांनी रेल्वे उड्डाण पुलावरून उडी घेतली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती समजतात नागरिकांनी परिसरात गर्दी केली असून रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे.