
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आली असून हिंगोली येथे स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सेनगाव परिसरातील साई मंदिर नजीक ही घटना 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाला उघडकीला आलेली आहे. आपल्या वडिलांच्या नावावर असलेले कर्ज फेडायचे तरी कसे यातून या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे
उपलब्ध माहितीनुसार, नवल जयराम नायकवाल ( राहणार कारेगाव तालुका सेनगाव ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याच्या वडिलांनी पेरणीसाठी कर्ज घेतले होते मात्र अतिवृष्टी आणि इतर कारणांनी पिकांचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे पूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. 26 नोव्हेंबर रोजी नवल हा घराबाहेर पडला आणि त्याने साई मंदिराच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाला गळफास घेतला.
सदर घटना उघडकीला येताच सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्या करताना त्याने स्वतःच्या स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर ठेवलेला होता मात्र हे कुणासाठी आहे हे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही मात्र अवघ्या काही वेळात ही घटना उघडकीला आली.